अंगावर येणारे ग्राहक कसे हाताळावेत?
भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामाच. मग तो सामना वर्ल्डकप मधला असो, की इतर कुठलाही असो. कसोटी सामना असो की एकदिवसीय सामना असो. प्रचंड प्रतिसादात हे सामने होतात. असाच एक कसोटी सामना भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला जात होता. जगातले सर्वात नावाजलेले जलदगती गोलंदाज देणारा संघ म्हणजे पाकिस्तान. सगळ्यात बलाढ्य वाटणारी फलंदाजी करणारे फलंदाज भारताकडे असत. त्यामुळे केवळ राजकीय शत्रू म्हणूनच नाही तर खेळाच्या गुणवत्तेवर देखील भारत पाकिस्तानचे सामने अटीतटीचे होत असत.
त्या दिवशी भारताची फलंदाजी सुरू झाली. सचिन, सेहवाग व गांगुली सारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना जोश चढला होता. शोएब अख्तर तर फार जोरात बाऊंस चेंडू फेकायला लागला होता. आलेल्या प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवून तो चेंडू सीमापार पाठवण्यासाठी सदैव सज्ज असलेला सेहवाग बाद झाला होता. तंत्रशुध्द फलंदाजी करत केवळ बॅटच्या कोनात बदल करून नजाकतीने व अगदी सहजपणे फटके मारत सहजपणे चौकार मिळवणारा सचिन सुध्दा बाद झाला होता. चेंडू बॅटवर यायच्या आधी टप्पा पडला तर पडला. मात्र चेंडू बॅटला लागल्यावर त्याला टप्पा पडायचा अवसर न देता थेट स्टेडियमच्या पत्र्यावर पाठवणारा गांगुली सुध्दा बाद झाला होता. भारताची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती.
धडाधड धावा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणारे तितकेच शांत व संयमी असणारे द्रविड आणि लक्ष्मण ज्यावेळी खेळपट्टीवर नांगर टाकून उभा असतात, तेव्हा खरी बघण्यासारखी अवस्था असते. हे दोघेजण फार धावाही काढत नाहीत. लवकर बादसुध्दा होत नाहीत. असा अनुभव त्या काळातल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला होता. शोएब अख्तर सगळे चेंडू १४० ते १५० पेक्षा जास्त गतीने टाकायचा. त्याला वाटले होते की, हे दोघे बाद झाले की सामना आपल्या बाजूने झुकणार आहे. तो दात ओठ खात जोरदार पळत येऊन बाऊन्सर टाकायचा. द्रविड तेवढ्याच सन्मानाने बॅट बाजूला काढून यष्टीरक्षक कामरान अकमलकडे चेंडू जाऊ द्यायचा.
स्टंपवर येणारा चेंडू तेवढा बॅट घालून तटवायचा. उरलेले चेंडू फक्त सोडून द्यायचे. कसलाही बाऊन्सर टाकला तरी त्याचा कोणताही परिणाम द्रविडने स्वतःवर होऊ दिला नव्हता. खेळ फक्त बॉलर व विकेटकीपरमध्येच चालला होता. शोएब अख्तरच्या रागाचा पारा उन्हाच्या पाऱ्याबरोबर वाढायला लागला. कामरान अकमल आडवा तिडवा पडून चेंडू अडवताना अक्षरशः वैतागून गेला. तो दिवस खेळून काढल्यावर मैदानाबाहेर निघताना शोएब अख्तरची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. द्रविडने अतिशय खिलाडूवृत्तीने कोणताही प्रतिकार न करता अख्तरला चांगलाच धडा शिकवला होता. कुणीतरी येऊन सुरूंग पुरावेत. दूर जाऊन सुरूंगाला बत्ती देण्याच्या आधीच एखाद्याने अगदी सहजपणे त्या सुरूंगाच्या वायरा मोकळ्या करून जाव्यात. त्यावेळी सुरूंगाचा आवाज होणार या अपेक्षेने कान लावणाराची जी फजिती होते. तीच फजिती राहुल द्रविडने शोएब अख्तरची करून सोडली होती. कामरान अकमलचा यात फुकट बळी गेला होता.
व्यवसाय करताना विनाकारण नडणारे ग्राहक, आपली काहीही चूक नसताना विनाकारण तक्रार करणारे ग्राहक, तसेच कायम असंतुष्ट असणारे ग्राहक जेव्हा आपल्यावर राग काढायला येतात. तेव्हा राहुल द्रविड नीती वापरायला पाहिजे. शिव्या देणाऱ्या माणसाला प्रत्युत्तरात शिव्यांची अपेक्षा असते. मारायला आलेल्या माणसाला प्रत्युत्तरात थोडा तरी मार अपेक्षित असतो. रागाच्या प्रत्युत्तरात राग, प्रेमाच्या प्रत्युत्तरात प्रेम अपेक्षित असते. बहुतेक वेळा सकारात्मक गोष्टींच्या मोबदल्यात नकारात्मक प्रतिसाद व नकारात्मक गोष्टींच्या बदल्यातसुद्धा नकारात्मक प्रतिसाद मिळतो. मात्र नकारात्मक गोष्टींच्या मोबदल्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची किंवा तटस्थ प्रतिसाद मिळण्याची शक्यता दुर्मिळ असते.
उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये काही दोष अथवा त्रुटी राहिल्यास आपण मान्य करायला पाहिजेतच. मात्र ग्राहक जर अवाजवी नखरे करायला लागला, तर त्याला असा उलट प्रतिसाद देऊन थंड करता आला पाहिजे. तो काहीही बोलला तरी त्याला नकारात्मक प्रतिसाद देऊ नका.
११ वेळा निवडून येऊन ५५ वर्षे आमदार राहिलेले सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांच्याबद्दल अनेक लोक सांगतात की, “एखादा माणूस गणपतरावच्या ऑफिसात जाताना मारण्यासाठी तलवार घेऊन जरी गेला असला, तरी परत येताना आमदारसाहेबांची तारीफ करत व हसतच बाहेर येतो.” प्रत्येक उद्योजकाचा स्वभाव असा असला पाहिजे. नाही म्हणताना सुध्दा एवढ्या सौजन्याने नाही म्हणा की, समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल तुमचा आदर वाटला पाहिजे.
पाठीचा कणा ताठ ठेऊनही प्रत्येकाला मान देता येतो. आयुष्यात सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत. सगळेच ग्राहक खुश असणारी कंपनी सापडणार नाही. सगळेच पुरवठादार आपल्या म्हणण्यानुसार काम करतीलच असे नाही. एखाद्या गाडीच्या मागे लागलेल्या कुत्र्याला त्या गाडीवानाला पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो. मात्र त्या गाडीचा अचानक ब्रेक लावला गेला तर काय करायचे? याचा विचार कुत्र्याने केला नसल्यामुळे ते माघारी निघून जाते. ग्राहक ज्यावेळी संतापाने येतो तेव्हा त्याला प्रतिहल्ला अपेक्षित असतो. त्याचे पूर्ण म्हणणे सांगून झाल्याशिवाय आपण तोंड न उघडता शांतपणे ऐकून घेतले तर आपण अर्धी लढाई तिथेच जिंकलेलो असतो. धन्यवाद.
✍️– अमोल चंद्रकांत कदम
🎯 व्यवसाय साक्षर व्हा....
🎯 उद्योजक बना.....
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
No comments:
Post a Comment